कविताः आपल्या मनातील स्थान व महत्व (भाग १ कवी सुरेश भटांची कविता)

कवी सुरेश भटांची कविता


              कविता हे अनेक प्रकाराने विस्तारलेले व्यापक असे साहित्य आहे. त्यात ओवी, अभंग, गझल, पोवाडा, भारुड असे अनेक काव्य प्रकारांचा अंतर्भाव होतो. अनेक थोर साहित्यिकांनी आपल्या लेखनाची सुरुवात कवितेनेच केली आहे. कविता ही सर्वांच्याच जवळची आहे.

              मराठी साहित्यक्षेत्रातील गझल या काव्य प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली ती कवी सुरेश भट यांनी. यांच्या गझलांकडे बघूनच अनेक नव कवींनी गझल लिहू लागले. एवढा प्रभाव त्यांचा होता. त्यांच्या अनेक सुंदर गझलांपैकी पुढील गझल पहा -

"जगत मी आलो असा"

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
                   (रंग माझा वेगळा  ह्या काव्यसंग्रहातून)

              सुरेश भटांनी आपल्या आयुष्यालाच गझलमय केले होते. शब्दांवर हुकूमत असली आणि भावनांना खोली लाभली तर
"उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली"


                 अशी कविता जन्माला येते.काव्य प्रतिभावंतांच्या शब्दकुंचल्यातून साहित्याच्या कॕनव्हॕसवर चितारला जातो. सुरेश भटांचे हे काव्य अखिल मराठी साहित्यात अधिक रंग भरण्याचे काम केले आहे.
                                      👤  अरुण व्ही लाडे
                                         दि. १७ जुलै २०१९ 

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....